Monday, July 12, 2021

प्रश्न रेशमी, उत्तर मखमली

 विषय-  *प्रश्न रेशमी... उत्तर मखमली*


 सात-आठ महिने झाले होते तो तिचा निरोप घेऊन जाण्याला...अगदी तृप्त मनाने...समाधानाने...तिने त्याला निरोप दिला होता...द्यायलाच हवा होता...नाही तर... *अति तेथे माती...* ही म्हण तिच्या चांगलीच परिचयाची होती...खूपदा तिने त्याचा अनुभवही घेतला होता... तिच्याइतका दारुण अनुभव आणखी कोणाच्या वाट्याला येणार म्हणा...


आणि आतां मात्र ती त्याची उत्कटतेने वाट पाहत होती...अगदी वेध लागले होते तिला त्याचे...त्याच्यासाठी तिने सगळी... अगदी सगळी तयारी करून ठेवली होती...थोडा त्रास झाला होता तिला...बरंच सहन करावं लागलं होतं... पण तिला त्याची तमा नव्हती... अखेर ती...*ती* होती...आणि ती तर असतेच सहनशील...खंबीर... आणि...


*आखिर कुछ पाने के लिए...*


पण कधीकधी तो नुसताच संकेत देत होता... आपल्या आगमनाचा...ती गडबडीनं आपलं विस्कटलेलं...जरासं विकल झालेलं रूप सावरत होती...


*वाट पाहुन नयन सख्या शिणले रे*


कधी कधी तो निरोप पाठवायचा...मी येतोय...आलोच बरं मी...आणि...पुन्हां हुलकावणी...ती पुन्हां कोमेजायची...नाराज व्हायची...


'कां रे असा छळतोस मला...ये ना लवकर... किती वाट पाहायला लावतोस...तुझ्याशिवाय मला दुसरं आहे तरी कोण...?' 


आणि मग तो तिच्या कानांत कुजबुजायचा...


' येऊ...? खरंच येऊ...? त्याचा मऊ मुलायम रेशमी  प्रश्न तिच्या मनांला स्पर्शुन गुदगुल्या करायचा...ती असोशीनं उत्तरायची...


'ये, लवकर ये...असा अंत नको पाहुस आतां...ह्या दीर्घ विरहानंतरची प्रतीक्षा  संपु दे एकदाची...'


अखेर तोही म्हणायचा...'चला, बस्स् झाला आता हा लपंडावाचा खेळ... नाहीतर बाईसाहेबांना गुस्सा यायचा...'


* गुस्सा इतना हसीन है तो...* 


'छे, छे...हा गुस्सा हसीन बिसीन कांही  नाही बरं...रागाने अगदी तप्त होऊन गेलेल्या असतात'


आणि...तो येतो...तिच्याकडे झेपावतो... झंझावाताप्रमाणे...तीही अनावर आवेगाने त्याला बिलगते...जिवाशिवाचं मंगल मिलनच जणूं...ती तृप्तीचे हुंकार देते...समाधानाचे निश्वास सोडते... पुन्हां...पुन्हां... 


आतां दोघांच्याही मिलनाचं सार्थक झालेलं असतं...तिचाही पहिलावहिला आवेग ओसरलेला असतो...त्यालाही जायचं असतं...कांही दिवसांसाठी...तो तिला हलकेच विचारतो...जाऊ मी...? ती म्हणते..


'अहं...येऊ म्हणावं...' तो एकवार तिला थोपटुन निघुन जातो...


आता तिच्या मनाला दुसरंच व्यवधान लागलेलं असतं...त्याची निशाणी तिच्या कुशीत वाढत असते...त्याला नीट जपायचं असतं...अर्थात् अधून मधून  त्याचीही सोबत हवीच असते...तोही ते कर्तव्य तत्परतेनं पार पाडतो...


आणि पुरेशा अवधीनंतर त्या दोघांचंही  इप्सित साध्य झालेलं असतं...आतां तिची भूमिकाही बदललेली असते...एक तृप्तीची साय तिच्या तनामनावर पसरलेली असते...


आणि पुन्हां एकदा तोच रेशमी प्रश्न...'मी येऊ...?' पण आतां मात्र...आतुर आगमनाचा...?अं..हं... हळव्या, कातर स्वरातील निरोपाचा...प्रदीर्घ कालावधीसाठी...


तिलाही त्याची अपरिहार्यता माहित आहे..‌.त्यामुळे आतां ती त्याला अडवत नाही... आपल्या कुशीतील लेकरांच्या *हिरव्या, पोपटी, मखमली जावळावरून* आपला ममतामयी हात फिरवत त्याला  उत्तर देते...स्निग्ध, शांत नजरेनंच...


सौ. भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

भेटी लागे जीवा

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2764237103868101&id=100008455146775&sfnsn=scwshmo

Saturday, July 10, 2021

आषाढगान

 शीर्षक- *आषाढगान*


आषाढाच्या प्रथम दिवशी

महाकवी कालिदास दिन

मेघदूतासम प्रसिद्ध काव्य

नाटकंही असती प्राचीन


वैशाखाच्या वणव्यामाजी

शुष्क, तृषार्त धरा तप्त

*येता बहरून आषाढ*  

प्राशुनी अमृत होई तृप्त


चराचरातील सृष्टीचेही

सुरु जाहले *आषाढगान*

पसरे हिरवा रंग सभोती

न्हाऊ घातले अवघे रान


मिरविती थेंब मोत्यांचे

हिर्वी पानं अंगावरती

जलद फिरती अंबरात

उतरण्यास अवनीवरती


बरसती आषाढधारा

वाट पाही चातक पक्षी

हिरव्या हिरव्या गालिच्यावर

गवतफुलांची रंगीत नक्षी


संजीवनी ठरे सकळांस

दुजे नांव आषाढाचे

बळीराजा, भुमी, वारकरी

स्वागत करू जलधारांचे


सौ. भारती महाजन रायबागकर

चेन्नई

Tuesday, July 6, 2021

काजव्यांची पालखी, स्वप्नांची पहाट

 *नक्षत्रांची पालखी निघाली*

*पहाट स्वप्नांची फुलली*


मध्यरात्रीची वेळ...संध्याकाळपासूनच विजांचा कडकडाट चालु आहे...दूरवर कुठेतरी थोडासा पाऊस पडतोय वाटतं...वीजही गेलेली...त्यामुळे सर्वत्र अंधाराचंच साम्राज्य...अन् निद्रा जागृतीच्या सीमेवर मनाचा लंबक हिंदकळतोय...भास-आभासांचा लपंडाव...स्वप्न-सत्याची शिवाशिवी...एक अनामिक हुरहुर...


पण हे काय... हा कुठला प्रकाश...मिटलेल्या डोळ्यांसमोरूनही त्याचा मंद उजेड जाणवतोय...अं हं...हा कांही लखलखणाऱ्या विजेचा प्रकाश नाही...डोळे दिपवुन टाकणारा...एक शांत...स्निग्ध अशी भावना जाणवतेय डोळ्यांना...वीजही आलेली नाही...मग काय असावं बरं... *उघड नयन देवा* ... अरे, हे...हे काय...


नभ उतरू आलं

धरा चांदणं ल्याली...


छे...छे...आकाशांतील चांदण्या तर तश्शाच आहेत...आपापल्या जागी...मग...


ओ हो...! हे तर काजवे...असंख्य...अगणित काजवे... ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत...काजवेच काजवे...काजव्यांची पलटण...? कांहीतरीच काय...ते काय सैन्य आहे लढाईला निघालेलं...मग...? काजव्यांचा मोर्चा...?बाई, बाई...काय ही कल्पनेची धाव...सरड्यासारखी कुंपणापर्यंत...काजव्यांची मिरवणुक...?बस् झाली निरर्थक उपमांची घोडदौड... 


ही तर काजव्यांची पालखी आहे पालखी...! हं...आतां हे नांव कसं छान शोभुन दिसतंय...


वारीत निघणाऱ्या पालख्या...पंढरपुरला निघालेल्या...विठ्ठलाच्या दर्शनाला... हरीनामाचा गजर करीत... समतेचा संदेश देत...मी...तू पणाचा विसर पडलेला... सर्वत्र भक्तीचाच रंग...भगवा...आणि तो रंग मिरवणारे वारकरी...शुभ्रधवल रंगात... *अवघा रंग एक झाला...*


हे काजवेही कांहीतरी संदेशच देत आहेत वाटतं...मी इवलासा असलो म्हणुन काय झालं...मी सूर्य नाही होऊ शकत... सगळ्या जगाला प्रकाश देणारा...पण मी माझ्यापुरता टिमटिमता  प्रकाश तर देऊ शकतो...आणि आमचा हा प्रकाशपुंज... यातुन बघा कसा प्रकाश निर्माण होतोय...थोडा उजेड कमी असेल पण तुम्हाला मोहुन तर टाकतोय...आमच्या एकीचं बळ आहे हे...


आणि ह्या पालखीचे भोई तरी कोण कोण आहेत...जराशी ओळख पटतेय...अरे, ही तर *आपली* *साहित्यनक्षत्रंच* आहेत सगळी...काजव्यांच्या मंद मंद प्रकाशांत सगळी कशी उठून दिसताहेत...स्वयंप्रकाशाने...


आपणही व्हावं कां त्यांत सामील...पेलवेल नं आपल्याला भोई  होणं...? हो...हे भोई कांही असे तसे नाहीत...सारस्वत आहेत ते सगळे...पण...घेतील ना ते आपल्याला त्यांच्यात... कां नाही...नक्कीच घेतील...अशी शंका सुद्धां कां यावी मनांमध्ये... आत्तांच काजव्याचा संदेश ऐकला ना... मग...?  तरीही...


*मैं अकेला था और कारवॉं बनता गया...*

असंच तर होत असतं नं...


 हो...त्या कारवॉंमध्ये सामील व्हायलाच हवं...आपल्या चालीनं...हळूहळू...पण सामील व्हायचंच...


पण मग... त्यासाठी आतां या निद्रादेवीची साथ सोडायला हवी...हो...हो...बरोबर...स्वप्नं पहाण्यासाठी तिचीच साथ हवी... पण तीं पूर्ण करण्यासाठी मात्र...उषेचेच स्वागत करायला हवे...तर आणि तरच... *स्वप्नांची पहाट फुलेल...* आणि ईप्सित साध्य करता येईल...खरं नं...?


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

Friday, June 25, 2021

आधुनिक सावित्री, तळ्यांत- मळ्यांत

    *आधुनिक सावित्री* 


      शीर्षक- *तळ्यांत मळ्यांत*


सत्यवान-सावित्रीची कथा आपण

वर्षानुवर्षे विश्वासानं ऐकतोय. आणि त्याच श्रद्धेनं दरवर्षी वटवृक्षाला फेरेही न चुकता नेमानं मारतोय.


त्या वटपर्णांच्या प्राणवायूतून तिच्या पतीला नवसंजीवन मिळाले

आणि फक्त त्या *एकाच* यमाचे आवळलेले करपाश सुटले.


 पण यमही आतां निरनिराळ्या भयंकर रूपांत सामोरा येतोय.

अपघात, घातपात, हार्टअटॅक, कॅन्सर 

ही अशी तर नित्याचीच रूपं...

पण किडनी फेल होण्यासारखे असाध्य जीवघेणे रोग, आणि आत्ताचं साध्या स्पर्शालाही महाग झाल्याने हतबल करणारं, भयंकर जीवघेणं संकट...

ही सुद्धां त्या यमाचीच आणखी कांही अक्राळविक्राळ रूपं!


शिवाय आज जिवंत वटवृक्ष सांपडतात कुठे सहजासहजी?

आणि सांपडलाच एखादा

तर...त्याच्यामुळे

आत्तांच्या या यमाचं कां...ही वाकडं होत नाही बरं!


मग स्वतःचा देह हाच एक वटवृक्ष असतो तिच्यापाशी.

आणि त्यातील तिची किडनी म्हणजे जणूं त्याचा बहि:श्चर प्राण...


पूर्वी नाही कां जादूच्या गोष्टींत राक्षसाचे प्राण दुसऱ्याच एखाद्या गोष्टीत सुरक्षित असायचे.

फरक एवढाच की तेव्हां राक्षसाचे प्राण हरण करायचे असत, आतां पती परमेश्वराचे प्राण वाचवायची पराकाष्ठा करायचीअसते. त्यासाठी वडाच्या नव्हे, दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात

आणि स्वतःची किडनी कर्तव्यभावनेनं दान करावी लागते. 


कधी घरावर आर्थिक संकट येतं, पण ही सावित्री डगमगत नाही. वेळ प्रसंगी आपलं स्त्री-धन सहजतेने पुढे करते. शारीरिक कष्ट करायला तर मागे पुढे पाहतच नाही पण मानसिक आधारही देऊन घराचा भक्कम आधारस्तंभ  बनते.


पण आजची सावित्रीबाई फुल्यांची लेक आचार विचारांनी आधुनिक झालेली असली तरीही तिच्या अंतरंगात रुढी, परंपरा यांची मूळं खोल रुजली आहेत. त्यामुळे दोन्ही डगरींवर हात ठेवतांना ती संभ्रमावस्थेत असतांना दिसते. नाहीतर पर्यावरणाचं महत्त्व मनांवर बिंबवत असतांनाच कधी घरच्यांच्या दबावामुळे, कधी 'लोक काय म्हणतील' ह्या सनातन बागुलबुवामुळे तर कधी स्वतःच्याच दोलायमान अवस्थेमुळे ती 'तळ्यांत-मळ्यांत' करून निसर्गाचं नुकसान करतांना दिसली नसती. कळतंय पण वळत नाही...


कित्येकदा पती दुर्गुणांचा पुतळा असतो. पण स्त्रीने मात्र सद्गगुणांची पुतळी असण्याची अपेक्षा असते. आणि पुष्कळदा ती तशी असतेही. कारण *न स्त्रीं स्वातंत्र्यमर्हती* हे मनुवचन मनोभावे पाळणारी आपली आदर्श पुरूषप्रधान संस्कृती. यांत अशिक्षितांबरोबरच सुशिक्षित पुरुषही मागे नसतात आणि हा त्रास सहन करूनही *सात जन्म हाच पती मिळो* अशी प्रार्थना करणाऱ्या स्त्रियांतही हा भेद दिसत नाही हे विशेष.( तो मिळतो कीं नाही हा भाग अलाहिदा)


भारतीय संस्कृती  खरोखरच महान आहे. आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक सणं, व्रतवैकल्यं यांचा काळ ठरवला आहे. त्यांचं तंतोतंत पालन केलं नाही तरीही त्यातलं मर्म जाणुन घ्यावं.  आपण भारतीय देवभोळे, नाही केलं तर तो *दयाघन*  कोपेल ही आपली (अंध)श्रद्धा,  म्हणुन त्याला धार्मिकतेची जोड दिली एवढेच.


आणि हे सर्व वटपौर्णिमे पुरतंच मर्यादित न ठेवता नेहमी पर्यावरण पुरकच दृष्टिकोन ठेवुन,प्रदुषण टाळुन निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. 


म्हणजे आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतांना ते निरामयच असेल आणि पुढच्या पिढीसाठीही हा निसर्गाचा ठेवा राखुन ठेवला तरच आपली व्रतवैकल्यं सार्थकी लागतील.


एकंदरीत अशा कितीतरी सावित्री जगत आहेत आज

मुक्या ओठांनी,अबोलपणे, आपल्या भरलेल्या कपाळासाठी...


सांगा, कुठल्या पुराणात नोंद होईल त्यांच्या नांवाची...

कुठला इतिहास दखल घेईल त्यांच्या त्यागाची...


आणि आणखी एक मनाला छळणारा अनुत्तरीत प्रश्न

तसाच प्रसंग आला...तर...


किती सत्यवान उभे राहतील पाठी...

आपल्या जन्म सावित्री साठी!


सौ. भारती महाजन -

रायबागकर, चेन्नई


२५-६-२१


Thursday, June 24, 2021

वसा एक, रूपं अनेक, वट सावित्रीचा वसा

 *वट सावित्रीचा वसा*


शीर्षक- *वसा एक, रूपं अनेक*


जुन्या रूढी,अर्थपूर्ण

होते त्यामागे धोरण

आरोग्याशी निगडीत

घेऊ जाणुन कारण


वड आधीच दुर्मिळ

नको फांदी तोडलेली

प्राणवायूसाठी लावु

नवी रोपं, रुजलेली


बदलत्या सावित्रीस

वसा अनेक रूपांत

कमावते पतीसह

लक्ष ठेवुन घरांत


देई हसत स्त्री-धन

येता संकट आर्थिक 

पती कसाही, मागते

त्याच्या आयुष्याची भीक


शरीराचा हिस्सा देई

जेव्हां निकड पतीला

*वट सावित्रीचा वसा*

तिने ऐसा चालविला


वसा सावित्रीस, कधी

असो सत्यवानासाठी

तेव्हां कळेल जगास

किती सावित्रीच्या पाठी!


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई 

२४-६-२१

Monday, June 21, 2021

योगासनं आपलीच

 *योगासनं आपलीच*



आला आला एकवीस जून

आजच्या पुरते जागती सकल

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा

नंतर करती चालढकल


आहे अतिशय महत्वाचं

योगासनांचं जीवनी स्थान

पूर्वसुरींनी सांगुन ठेवलंय

योग परंपरा किती महान


फक्त संकटी नको आठवण

हवी निरंतर संगत

शरीरस्वास्थ्य,मन:शांतीने

वाढे आयुष्याची रंगत


सूर्यनमस्कार किमान बारा

सहजच पाळु, नित्यनेम

आदित्यावर अवलंबूनी

चराचराचे कुशलक्षेम


आपलीच योगासनंं तरीही

आयात करू *आपलंच ज्ञान*

पाश्‍चात्त्यांनी दखल घेता

कळते, मायदेशाची शान


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

२१-६-२१