Friday, June 25, 2021

आधुनिक सावित्री, तळ्यांत- मळ्यांत

    *आधुनिक सावित्री* 


      शीर्षक- *तळ्यांत मळ्यांत*


सत्यवान-सावित्रीची कथा आपण

वर्षानुवर्षे विश्वासानं ऐकतोय. आणि त्याच श्रद्धेनं दरवर्षी वटवृक्षाला फेरेही न चुकता नेमानं मारतोय.


त्या वटपर्णांच्या प्राणवायूतून तिच्या पतीला नवसंजीवन मिळाले

आणि फक्त त्या *एकाच* यमाचे आवळलेले करपाश सुटले.


 पण यमही आतां निरनिराळ्या भयंकर रूपांत सामोरा येतोय.

अपघात, घातपात, हार्टअटॅक, कॅन्सर 

ही अशी तर नित्याचीच रूपं...

पण किडनी फेल होण्यासारखे असाध्य जीवघेणे रोग, आणि आत्ताचं साध्या स्पर्शालाही महाग झाल्याने हतबल करणारं, भयंकर जीवघेणं संकट...

ही सुद्धां त्या यमाचीच आणखी कांही अक्राळविक्राळ रूपं!


शिवाय आज जिवंत वटवृक्ष सांपडतात कुठे सहजासहजी?

आणि सांपडलाच एखादा

तर...त्याच्यामुळे

आत्तांच्या या यमाचं कां...ही वाकडं होत नाही बरं!


मग स्वतःचा देह हाच एक वटवृक्ष असतो तिच्यापाशी.

आणि त्यातील तिची किडनी म्हणजे जणूं त्याचा बहि:श्चर प्राण...


पूर्वी नाही कां जादूच्या गोष्टींत राक्षसाचे प्राण दुसऱ्याच एखाद्या गोष्टीत सुरक्षित असायचे.

फरक एवढाच की तेव्हां राक्षसाचे प्राण हरण करायचे असत, आतां पती परमेश्वराचे प्राण वाचवायची पराकाष्ठा करायचीअसते. त्यासाठी वडाच्या नव्हे, दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात

आणि स्वतःची किडनी कर्तव्यभावनेनं दान करावी लागते. 


कधी घरावर आर्थिक संकट येतं, पण ही सावित्री डगमगत नाही. वेळ प्रसंगी आपलं स्त्री-धन सहजतेने पुढे करते. शारीरिक कष्ट करायला तर मागे पुढे पाहतच नाही पण मानसिक आधारही देऊन घराचा भक्कम आधारस्तंभ  बनते.


पण आजची सावित्रीबाई फुल्यांची लेक आचार विचारांनी आधुनिक झालेली असली तरीही तिच्या अंतरंगात रुढी, परंपरा यांची मूळं खोल रुजली आहेत. त्यामुळे दोन्ही डगरींवर हात ठेवतांना ती संभ्रमावस्थेत असतांना दिसते. नाहीतर पर्यावरणाचं महत्त्व मनांवर बिंबवत असतांनाच कधी घरच्यांच्या दबावामुळे, कधी 'लोक काय म्हणतील' ह्या सनातन बागुलबुवामुळे तर कधी स्वतःच्याच दोलायमान अवस्थेमुळे ती 'तळ्यांत-मळ्यांत' करून निसर्गाचं नुकसान करतांना दिसली नसती. कळतंय पण वळत नाही...


कित्येकदा पती दुर्गुणांचा पुतळा असतो. पण स्त्रीने मात्र सद्गगुणांची पुतळी असण्याची अपेक्षा असते. आणि पुष्कळदा ती तशी असतेही. कारण *न स्त्रीं स्वातंत्र्यमर्हती* हे मनुवचन मनोभावे पाळणारी आपली आदर्श पुरूषप्रधान संस्कृती. यांत अशिक्षितांबरोबरच सुशिक्षित पुरुषही मागे नसतात आणि हा त्रास सहन करूनही *सात जन्म हाच पती मिळो* अशी प्रार्थना करणाऱ्या स्त्रियांतही हा भेद दिसत नाही हे विशेष.( तो मिळतो कीं नाही हा भाग अलाहिदा)


भारतीय संस्कृती  खरोखरच महान आहे. आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक सणं, व्रतवैकल्यं यांचा काळ ठरवला आहे. त्यांचं तंतोतंत पालन केलं नाही तरीही त्यातलं मर्म जाणुन घ्यावं.  आपण भारतीय देवभोळे, नाही केलं तर तो *दयाघन*  कोपेल ही आपली (अंध)श्रद्धा,  म्हणुन त्याला धार्मिकतेची जोड दिली एवढेच.


आणि हे सर्व वटपौर्णिमे पुरतंच मर्यादित न ठेवता नेहमी पर्यावरण पुरकच दृष्टिकोन ठेवुन,प्रदुषण टाळुन निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. 


म्हणजे आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतांना ते निरामयच असेल आणि पुढच्या पिढीसाठीही हा निसर्गाचा ठेवा राखुन ठेवला तरच आपली व्रतवैकल्यं सार्थकी लागतील.


एकंदरीत अशा कितीतरी सावित्री जगत आहेत आज

मुक्या ओठांनी,अबोलपणे, आपल्या भरलेल्या कपाळासाठी...


सांगा, कुठल्या पुराणात नोंद होईल त्यांच्या नांवाची...

कुठला इतिहास दखल घेईल त्यांच्या त्यागाची...


आणि आणखी एक मनाला छळणारा अनुत्तरीत प्रश्न

तसाच प्रसंग आला...तर...


किती सत्यवान उभे राहतील पाठी...

आपल्या जन्म सावित्री साठी!


सौ. भारती महाजन -

रायबागकर, चेन्नई


२५-६-२१


Thursday, June 24, 2021

वसा एक, रूपं अनेक, वट सावित्रीचा वसा

 *वट सावित्रीचा वसा*


शीर्षक- *वसा एक, रूपं अनेक*


जुन्या रूढी,अर्थपूर्ण

होते त्यामागे धोरण

आरोग्याशी निगडीत

घेऊ जाणुन कारण


वड आधीच दुर्मिळ

नको फांदी तोडलेली

प्राणवायूसाठी लावु

नवी रोपं, रुजलेली


बदलत्या सावित्रीस

वसा अनेक रूपांत

कमावते पतीसह

लक्ष ठेवुन घरांत


देई हसत स्त्री-धन

येता संकट आर्थिक 

पती कसाही, मागते

त्याच्या आयुष्याची भीक


शरीराचा हिस्सा देई

जेव्हां निकड पतीला

*वट सावित्रीचा वसा*

तिने ऐसा चालविला


वसा सावित्रीस, कधी

असो सत्यवानासाठी

तेव्हां कळेल जगास

किती सावित्रीच्या पाठी!


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई 

२४-६-२१

Monday, June 21, 2021

योगासनं आपलीच

 *योगासनं आपलीच*



आला आला एकवीस जून

आजच्या पुरते जागती सकल

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा

नंतर करती चालढकल


आहे अतिशय महत्वाचं

योगासनांचं जीवनी स्थान

पूर्वसुरींनी सांगुन ठेवलंय

योग परंपरा किती महान


फक्त संकटी नको आठवण

हवी निरंतर संगत

शरीरस्वास्थ्य,मन:शांतीने

वाढे आयुष्याची रंगत


सूर्यनमस्कार किमान बारा

सहजच पाळु, नित्यनेम

आदित्यावर अवलंबूनी

चराचराचे कुशलक्षेम


आपलीच योगासनंं तरीही

आयात करू *आपलंच ज्ञान*

पाश्‍चात्त्यांनी दखल घेता

कळते, मायदेशाची शान


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

२१-६-२१

Sunday, June 20, 2021

बाप आधीचे-बाप आतांचे

 *बाप आधीचे...बाप आतांचे*...


 - *फा...र आधीच्या... आमच्या पणजोबांच्या वेळेच्या बापांबद्दल न बोललेलंच बरं*...


- त्यांची फोटोतील उपरणं, फेटाधारी,उग्र, करारी प्रतिमा पाहुन आणि त्यांच्याबद्दल इतरांकडून ऐकुनच अंगाला भरतंय कापरं...


*आमच्या* *आजोबांच्या वेळेचे* *बाप*


- फेटा तर क्वचितच,

 पण टोपी येई कामी

माया दिसत नव्हती, 

शिक्षेची मात्र हमी


- बाप येता दारांत, 

मुलं लपती घरांत

चिडीचूप घर सारं, 

आईचाही थरथरे हात


- *आमच्या वेळचे बाप*...


- शर्ट, पायजमा, टोपी, 

हाच वेश सर्वांचा

शर्ट, पॅन्ट, शुज... 

जरा जास्त शिकलेल्यांचा


- पण बाप असायचे...जसे नारळ

वरून कठीण कवच, आंत मधुर जळ


- बाप असायचे...जसा फणस

आंत मधुर गर, वर कांटेरी स्तर


- बापाशी बोलण्यासाठी लागे

 आईच्या पदराचा आधार

त्यांच्या शिस्तीचा तेव्हां

 राग येत असे फार...


- *आतांचा बाप*...


 - 'अहो बाबा' वरून 'अरे बाबा' वर कधी आला ते कळलंच नाही

बाप मुलांच्या मैत्रीची देतात ते ग्वाही


- 'अरे बाबा, कांही कळतंच नाही तुला

थांब समजावुन सांगतो, हे माहिती आहे आम्हांला'


- बापही निमूटपणे ऐकतो,

 मानत नाही अपमान

*बाप से बेटा/ बेटी सवाई* 

म्हणतो, वाढते आपली शान...


- बाप मुलांसाठी राबत होता तेव्हांही 

बाप मुलांसाठी खपत असतो आतांही...


- कधी असते मुलांना जाणीव,

कधी म्हणती तुमचेच  कर्तव्य

*जातील आपल्या वंशा*

 तोपर्यंत *मा फलेषु कदाचन*

असं म्हणत जगायचं असतं...


पण तरीही...


 - आतांच्या बाप मुलांचं

 हे निकोप, खेळकर नातं

मनाला आमच्या भावतं

 *जमाना बदल गया है*

आपल्याच मनाला समजावतं.


सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

Monday, June 7, 2021

चारोळी---दर्पण/आरसा

 *चारोळी*

*दर्पण-आरसा*

१) शब्द- ८

दिसे प्रतिबिंब छान

जल-दर्पणी, प्रशांत

जरा पाहु डोकावुन

अंतर्मन-दर्पणांत


२) शब्द- ८

गेलाय उडोनी आतां

आरशावरील पारा

चेहरा दिसे धुसर 

चढतोय माझा पारा 


३) शब्द- ९

दिसते वार्धक्याची खुण

साठी उलटता वयाची

पहाया, रुपेरी पताका

साथ हवीच आरशाची


सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

Sunday, June 6, 2021

33 आधुनिक बलुतेदार

 33 *आधुनिक बलुतेदार*



      तर मंडळी!

कामवाल्या मावशीचे अनुभव किती जणींना आपल्या अगदी जवळचे वाटले? सध्यांच्या काळांत बाकीची सर्व कामं आपण थोपवून धरली असली, तरी रोजची झाडू, फरशी, धुणी,भांडी ही कामं मात्र रोजच करावी लागतात. त्यातलं कपडे धुणं एकदा, फरशी पुसणं एकदा किंवा एक दिवसाआड, झाडणं दोनदा अशी केली तरी चालतात. भांडी मात्र एखाद्या गाण्यांतील कडव्यांच्या संख्येनुसार गाव्या लागणाऱ्या 

ध्रूवपदा प्रमाणे दिवसांतून किमान तीनदा तरी घासावी लागतात. आणि मग आपल्या कामवाल्या मावशीची आठवण कितीदातरी येते.आतां जेव्हां ती पुन्हा कामावर येऊ शकेल तेव्हां तिच्याशी कामांबद्दल तक्रार करतांना आपण नक्कीच पुन्हां पुन्हां विचार करू. तिच्या वंशाला जाऊन आपल्याला आतां पुरतं कळून चुकलंय कीं.......


सध्यां जरी ती आपली कामं करू शकत नसली तरी कुणी तिचा पूर्ण पगार देतंय, कुणी अर्धा आणि कुणी कांहीच देत नाही. आपल्याला वाटतंय की तो पगार देऊन आपण उपकार करतो तिच्यावर...पण वस्तुस्थिती तशी नाहीये, तिला खूप शरमिंध वाटतंय हा फुकट पगार घ्यायला. 'सगळी काळजी घेईन, पण मला कामावर येऊ द्या, आंग आंखडुन गेलंय बसून बसून.' असे तिचे सारखे फोन येत आहेत. अशावेळी तिला कामवाली, मदतनीस यापेक्षांही आपल्या घरच्या सदस्याचा दर्जा द्यावासा वाटतो.


पूर्वी गांवात बारा बलुतेदार असत. आपण तब्बल दोन डझन पेक्षाही जास्त बलुतेदारांना भेटलो. त्यांतील कांही जण 'अलुतेदार' होते तर कांही 'बलुतेदार, तर कांही कामवाल्या मावशी सारखी 'महाबलुतेदार.' अलुतेदार म्हणजे नैमित्तिक प्रसंगी लागणारे आणि बलुतेदार म्हणजे वारंवार लागणारे. त्यांच्या कामाच्या महत्त्वाप्रमाणे त्यांना धान्य दिले जात असे. फक्त तेव्हां ते शेतकऱ्यांच्या /मालकाच्या मनांवर असे. आतां मात्र जमाना बदलला, भूमिकाही बदलल्या.


यांतील कांही परंपरागत बलुतेदारांनी काळाबरोबर बदलत आपलं स्वरूप बदललं. नव्या जीवनशैलीला अनुरूप असं कौशल्य आत्मसात केलं आणि ते फक्त तगुनच राहिले असं नाही तर शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी आपली प्रगतीही केली. काहींनी लोकांच्या वाढत्या गरजांच्या संख्येनुसार/प्रकारानुसार नवनवीन कामं शिकून घेतली आणि ते *आधुनिक  बलुतेदार*  म्हणून उदयाला आले. ज्यांना कांहीच जमलं नाही ते मात्र नाईलाजानं जीवनौघांत प्रवाहपतिता सारखे वाहत राहिले.


तांत्रिक युगांत कुटुंबाचा आकार आक्रसत असतांना आणि आपलं वर्तुळ *आपण-आपलं* *आम्ही-आमचं* *ते *मी-माझं* असं संकुचित होत असतांना ही सर्व मंडळी मात्र आपल्या आयुष्याच्या परिघांत सहज सामावल्या जातात. ते नातलग नसतात पण त्यांचं असणं ही आपली गरज असते. 


आपली बरीचशी नाती रक्ताची असतात. ती जन्माबरोबरच आपल्या सोबत असतात. पण कधी कधी ती फक्त *आहेत* म्हणून *असतात*. त्यांत मायेचा ओलावा, जिव्हाळा असतोच असं नाही. तर पुष्कळदा रक्ताचं कांहीच नातं नसतांना फक्त प्रेम, स्नेहाच्या रेशीम धाग्यांच्या नात्यांची वीण अधिक घट्ट, गहिरी होत जाते. इतकी घट्ट की संशयाच्या, गैरसमजाच्या दुःखाचं सावट जरी त्यावर पसरलं तरी ते लगेच विरून जातं. या नात्यांना नावाचं लेबल नसतं, ती अनाम असतात इतकंच...

 जवळपास गेल्या महिनाभर आपण दररोज एका बलुतेदाराला भेटत होतो.


मंडळी! या प्रत्येक बलुतेदाराच्या केलेल्या वर्णनातील  प्रसंग कमी जास्त प्रमाणांत आपल्या प्रत्येकाच्या अनुभवास आले असावेत. पुढेही आपल्या दैनंदिन व्यवहारांत, भविष्यातही कदाचित त्यांचे अनुभव येतच राहतील. लिहिण्याच्या ओघांत कुठेकुठे अतिरंजितपणा आलाही असेल, पण तो क्षम्य असावा.


हे लिखाणही मी *थोडक्यात गोडी* या उक्तीप्रमाणे केव्हांच संपवणार होते. रोज लेख पाठवला कीं ठरवायचे, हा शेवटचाच बरं कां!  पण रात्री प्रतिक्रियांच्या शेवटी *आतां उद्या कोण?* हा प्रश्न वाचला कीं तो निश्चय डळमळीत होऊन मी पुन्हां पुढच्या बलुतेदाराला आपल्यापुढे सादर करायचे. 


कांही बलुतेदार अजूनही एकमेकांना बाजूला सारत 'मला पण भेटू दे नं सर्वांना... मला पण 'असं म्हणत माझ्याकडे हट्ट करत आहेत, पण....


*कधी थांबणार?* या प्रश्नांपेक्षा *कां थांबलात?* हा प्रश्न जास्त अर्थपूर्ण आहे, असं थोरामोठ्यांनी म्हणून ठेवलंय, नुसतंच म्हटलं नाहीतर आचरणातही आणलंय. माझी त्यांच्याशी  तुलना करण्याचा अजिबात विचार नाही, ती होऊच शकत नाही. पण *महाजनो येन गत: स पन्थ:* मी विराम घेतलाय.

या लेखन प्रवासांत आपण सर्वांनी आपल्या बहुमोल भावना वारंवार माझ्यापर्यंत पोचवल्या.

मी आपली अत्यंत आभारी आहे.

भेटुया........ पुन्हां....... कधीतरी


सौ..भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Friday, June 4, 2021

32. आधुनिक बलुतेदार

 *32*   *आधुनिक बलुतेदार*


काल जेवण झाल्यानंतर उशीर झाला म्हणून तसंच झोपुन गेलो. टोचणाऱ्या गादीवर झोप आली नाही ही गोष्ट वेगळी. 


आतां मात्र हा पसारा आवरतांना आपली कंबर ढिली होणार. कारण कामवाली मावशी दुपारी उशीरा येणार, नंतर   धुसपुसत तो पसारा कसाबसा आवरणार, तोपर्यंत हे काम असंच कसं ठेवायचं. त्यांतही ती आली तर ठीक, नाहीतर अचानक सुट्टी घेतली तर... 


 अशी ही जिच्यावाचुन आपले, विशेषतः महिलांचे पदोपदी अडते  ती... आपली…


      *मोलकरीण, कामवाली बाई किंवा मदतनीस*



पूर्वी गांवातल्या सर्वच बायका घरचं काम स्वतः करत. शिवाय शेतांत मजुरीलाही जात. त्यामुळेच मालकीण आणि कामवाली बाई त्या स्वतं:च असत. फक्त तालेवार  किंवा सावकार यांच्या घरी माणसं /बायका  कामाला असत. वडिलोपार्जित मिळालेलं कर्ज, आणि त्यावरील व्याज फिटण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी काम करण्याशिवाय गत्यंतरच नसे. कर्ज फिटत नसेच, ही गोष्ट वेगळी. मग त्यांची मुलं ते कर्ज फेडण्यासाठी तिथंच कामाला जाऊ लागत. असं पिढी दर पिढी हे दुष्टचक्र चालत असे.


पुढे शहरांत स्त्रिया नोकरी करू लागल्या आणि त्यांना मदतीला कोणीतरी हवं असं  वाटु लागलं. नोकरी केली नाही तरी घर काम करणे हे तब्येतीमुळे किंवा कंटाळ्या मुळे शक्य होत नसे. गांवातून शहरांत आलेल्या गरीब कुटुंबांनाही कांहीतरी काम हवंच होतं. असं दोघींच्याही गरजेतून घरकाम करणाऱ्या मावशींची  जमात उदयाला आली असावी. 

 ( दोन-तीन दिवस जर बदली न देता बाई आली नाही तर किती तारांबळ उडते आपली. अक्षरशः देव आठवतात सगळे. गृहिणी असली तर कसंतरी निभावून तरी नेता येतं. पण नोकरदार स्त्रियांची तर तारेवरची कसरत असते. )


तिला कामावर ठेवतांना साधारण असे प्रसंग घडतात. आपण तिला आधी आपल्या कामाचं स्वरूप समजावून सांगत असतो तेव्हां ती आपल्या पूर्ण घरावरून शोधक नजर फिरवत असते, घरातल्या माणसांचा अंदाज घेते, आणि मग विचारते, "काय काय काम करायचं हाय?"

 (समजा)

आपल्याला स्वयंपाकाला बाई ठेवायची असली तर आपण म्हणतो,

“ आम्ही पांच माणसं आहोत, त्यांचा स्वयंपाक करायचा. फुलके पातळ झाले पाहिजेत, चट्टे पडायला नको. फुलके सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेला गरम करायचे. भाजी नीट बारीक चिरुन घ्यायची. जास्त तिखट करायची नाही. आणि सर्वांत शेवटी कुकर लावायचा. ओटा नी...ट आवरून घ्यायचा. त्यानंतर इतर कामं करायची. आपल्याला मध्येच थांबवून विचारते, 

“थांबा थांबा, ताई,

 पोळ्या किती करायच्या? त्याप्रमाणे माज्या येन्याआदी तुमी कणीक मळुन ठेवायची. प्रत्येक पोळीचा इतका रेट हाये. ज्यादाच्या पोळीचे ज्यादा पैसे लागतील. आन भाजी तुमी चिरून ठेवायची. पालेभाजी असली तर आदी धुऊन घ्यायची. डाळ तांदूळ धुऊन ठेवायचे.”


“ आणि मग तू काय करणार?”


मी फक्त पोळ्या लाटणार, भाजी  फोडणीला घालणार, आणि डाळ तांदळाचे डबे कुकरमध्ये ठेवून तो गॅसवर ठेवणार.!


 तिनं सांगितलेल्या रेटप्रमाणे आपण आयुष्यभर किती रुपयांच्या पोळ्या लाटून, प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे, गरम करून खाऊ घातल्या याचा मनांतल्या मनांत हिशोब करून आपण हतबुद्ध होऊन पहातच रहातो. तिला कांही बोलणार एवढ्यात आपले गुडघे हलवून हलवून आपल्याला भानावर आणतात. आंता पोळ्या लाटणं तर होतच नाही. मग काय करणार! तिच्या अटी ऐकणं

भागच पडतं.


“आणखी काय काय कामं करायचीत?” तिनं विचारल्यावर आपण सांगायला सुरुवात करतो...


"हे सर्व घर झाडून घ्यायचं, कोन्या कोपऱ्यातून..."

" बरं पुढं... "

“सर्व फरशी नीट पुसून घ्यायची, प्रत्येक खोलीतील फरशी पुसून झाल्यावर पाणी बदलायचं.”

“आस्सं... पुढं...”

"कपडे हाताने धुवायचे”

"कामुन  वं, ती मशीन दिसतीया कीं..." आपल्याला थांबवुन ती विचारते, 

“मला नाही आवडत मशीनचे कपडे...”

“भांडी स्वच्छ घासायची, साबण ठेवायची नाही, आणि दोनदा यायचं सकाळ-संध्याकाळ...”


"झालं तुमचं?" ती शांतपणे विचारते.


"आता सांग, किती पगार घेशील?”  

आणि तिने सांगितलेला आंकडा ऐकून आपण एकदम जमिनीवर येतो.

“अगं खूप झाला हा, मी पहिल्या बाईला इतकाच देत होते.”


“ म्हणून तर ती सोडून गेली न्हवंं, आसंल एकांदी आडलेली, मी बी तेवडाच पगार घिन, पर एकाच बकेटीत पुऱ्या घरची फरशी पुशीन, कापडं हातानं धुनार नाय, ती वाशिंग मशीन जाम हुईल वापरल्या बिना...आणि भांड्यान्ला आन् पोळ्यान्ला      बी एकडावच यीन, आन जुनं कापडं तुमी माझ्या बिगर कोणाला देनार! हाय का कुबुल?”

आणि आपण शरणागती पत्करून 'कबूल, कबूल, कबूल ' असं म्हटलं कीं ती विचारते, “

“मंग यिऊ का उद्यापास्नं?”

आपण हो म्हटल्याबरोबर ती आठवल्यासारखं करून म्हणते...

“रविवारी मी येणार नाय, माजी सुट्टी असते, आन्  ती भांडी सोमवारी घासायला टाकायची न्हाईत. आल्या आल्या मला च्या लागतो, ताज्या दुधाचा... आदीची उकळलेली पावडर टाकायची नाय, पावन्यांचे कापडं मी धुवायची नाय, आन् अधनंमधनं खाडे झाले तर ते कापायचे नाय. ठरलं तर मग ...येत्ये उद्यापास्नं. किती वाजतां यिऊ? "


 आणि आपण विचार करून सांगते असं म्हणेपर्यंत आपली पाठ, कंबर आपल्याला *हाय, हॅलो*  असं म्हणतात. शिवाय उद्या तिचा विचार बदलला तर काय करायचं या धास्तीने आपण घाईघाईत तिला म्हणतो,

"अगं, उद्यापासुन  कशाला?आजपासुनच...नाही, नाही... आत्तांपासुनच सुरु कर कीं काम!"


भेटुया…...


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334



Thursday, June 3, 2021

31 आधुनिक बलुतेदार

 *31*   *आधुनिक बलुतेदार*


पीठ दळुन आणलं, स्वयंपाक झाला, जेवणावर भरपेट तावही मारून झाला, आतां...? आतां काय... किती उशीर झालाय एवढी सगळी उठाठेव करतांना...बाहेर जेवायला नक्को म्हणे...मग आतां निद्रादेवीची आराधना करायची...पण हे काय...!ही गादी अशी काय टोचतेय पाठीला! च्च...कापूस गोळा झालाय वाटतं...नाहीतरी खूपच जुन्या झाला होत्या गाद्या...आणि आतां सगळंच नवीन आणलंय तर गाद्याही नवीनच कराव्यात...कसं...


                 *गादीघर वाला*


पूर्वीचं आठवतं? सगळ्यांनाच नाही आठवणार. लहान गावांत बायका दुपारच्या जराश्या निवांत वेळी अंगणात गोधड्या शिवत बसलेल्या दिसायच्या. अर्थात या निवांत बायका म्हणजे ज्यांना शेतात जाणं शक्य नसायचं अशा वयस्कर बायका. 

गोधडी म्हणजे जुनी, सुती,२-३ नऊवारी लुगडीं गोधडीच्या आकाराप्रमाणे एकाआत एक नीट घडी घालून ती जमिनीवर अंथरायची  आणि जाड दोऱ्याने त्यावर सुबक धावदोरा घालायचा. ह्याच गोधड्या मातीच्या जमिनीवर झोपतांना सर्वसामान्य माणसांच्या अंथरूण आणि पांघरून म्हणूनही कामी यायच्या. तालेवाराकडे क्वचित गाद्या असायच्या.

आता शहरांत मातीच्या जमिनीही नाहीत आणि सहसा जमिनीवर कोणी झोपतही नाही. लोखंडी पलंग, लाकडी दिवाणावर झोपण्यासाठी गाद्यांची आवश्यकता अपरिहार्य झाली. आणि साहजिकच गादीघरवाला हा नवा बलुतेदार उदयास आला.

पूर्वीही कापूस पिंजून घ्यायचे. आधी एक धनुकली घेऊन, नंतर हात गाडीवर यंत्र लावून घरोघरी जाऊन  *आपल्याच अंगणात* कापूस पिंजून देत असत. आता अंगणही नाही आणि म्हणुन ते दारावर येऊन पिंजून देणारेही नाहीत. म्हणून हळूहळू इतरांप्रमाणे  यांनीही आपली दुकानं थाटली आणि आतां त्यांच्याच  *अंगणात* आपल्याला गाद्या भरायला जावं लागतं. *अमुक गादी घर* अशी पाटी दुकानांवर झळकू लागली. झळकते कसली! कापसाचे तंतू उडुन झाकोळलेली असते खरं तर. 

एखादा दुकानाचा गाळा...बाहेर आठ-दहा गाद्यांची थप्पी, एका बाजूला थोडेफार गादीच्या कापडाचे तागे, वर टांगलेल्या ऊशा, आणि एका बाजूला गाद्या-ऊशांच्या खोळी शिवण्यासाठी मशीन असे साधारण त्या दुकानाचे दर्शनी स्वरूप असते.

मागच्या भिंतीशी कापूस पिंजायचे यंत्र आणि  *माळ्यावर कापसाने भरलेली पोती*  ठेवलेली असतात. आणि कापसाचे बारीक तंतू आणि कचऱ्याचे कण बाहेर उडुन येऊ नयेत म्हणून एखाद्या कापडाचा किंवा बारदानाचा पडदा लावलेला असतो. बारदान म्हणजे विरळ विणीचं पोतं किंवा फारी किंवा किंतान.

या दुकानाच्या बाहेर रस्त्यावरच एखादं बेडशीट किंवा बारदान टाकून  एक दोन कारागीर एखाद्या गादीला टाके घालत बसलेले असतात किंवा ती पूर्ण झाल्यावर तिच्यावर काठीने धोपटुन आंतील कापुस एकसारखा पसरवत असतात. अशावेळी या सर्वांच्या तोंडाला कपडा बांधलेला असतोच असंही नाही.

आपण आपली गादी त्याच्याकडे घेऊन जातो. एकदा तिच्याकडे पाहून तो गादीच्या आकाराप्रमाणे (सिंगल बेड-डबल बेड) प्रकाराप्रमाणे (साधी- बॉक्स टाईप)  साधारण दोन चार दिवसांची मुदत सांगतो. अशावेळी आपण एकाच वेळी सर्व काम एकदाच करून घेऊ या विचाराने जर घरांतील सर्वच गाद्या एकदम घेऊन गेलो तर मग तोपर्यंत झोपायचं कशावर हा प्रश्न पडतो. आणि कांही पर्याय नसला तर त्यांतल्या त्यात लवकर देण्याची विनंती करून सतरंजीवर झोपण्याचा पर्याय स्वीकारतो. अशावेळी पाठदुखी साठी सतरंजीच बरी असंही आपल्या मनाला घरातल्या सर्वांना पटवुन देतो.

कधी तो आपल्या गाद्यांचा कपडा पाहून म्हणतो,

“पुराना हो गया है साब, बनाते बनातेही फट जायेगा, खाली पिली नुसकान, देखो अपने पास बढीया कपडा है, एकदम फस्क्लास, बोलो कौनसा दू?”

आपण एकदा गाद्यांकडे आणि एकदा त्याच्याकडे,मग गाद्यांच्या कपड्याकडे बघतो. आणि निघतांना घरून दिलेल्या  "नीट लक्ष द्या, कापसाची अदलाबदल होऊ देऊ नका, कपडा चांगला आहे गाद्यांचा, उगीच नव्याचा खर्च नको आत्तांच, अन् हो...समोर बसूनच भरून घ्या गाद्या...कितीही वेळ लागला तरी... इत्यादी इत्यादी ह्या ढिगभर सूचना आठवताच क्षणभर 

'नको नको हाच राहू दे कपडा' असं म्हणावं वाटत असतांनाच...तो म्हणतो,

“ठीक है साब, भरता हू इसमेच” पण ह्या त्यांच्या प्रकट वाक्याबरोबर आपल्याला 'मेरा क्या, मेरा फायदाच है इसमे' हे स्वगत ऐकू येते. आणि आपण नवा कपडा घेऊन टाकतो.

कधीकधी कापसाबाबतीतही असंच होतं. त्याच्या जवळच्या रेडिमेड गाद्या चांगल्या कापसाच्या नसतील अशी खात्रीच असल्यामुळे आपण त्या पसंत करत नाही. शिवाय आपल्याला फसवून तो आपला चांगला कापूस बदलून कमी प्रतीचा भरेल अशी सार्थ भीती वाटत असते. मग आपण 'किती छान झोप लागेल यावर' अशी दिवास्वप्नं पहात त्याच्याकडचा अगदी उच्च प्रतीचा कापूस महाग असला तरीही घेतो. आणि आपल्या समोरच गाद्या उशा भरून दे असा आग्रह करतो. आपल्या कामाची आणि त्याच्या वेळाची सांगड जमली तर तो तयारही होतो. आपण बाजी मारल्याच्या समाधानानं बाहेरच्या खुर्चीवर, बाकड्यावर, कधी पायरीवर सुद्धा ठिय्या मारून बसतो.  आणि बाहेर जर गादीला टाके घालणं चालू असेल तर आपण मन लावून ते काम बघत बसतो. पण गादी धोपटणं चालू असेल तर मात्र शेजारच्या एखाद्या पायरीचा आसरा घ्यावा लागतो. पण... *परदे के पीछे क्या है*  हे आपल्याला कुठे माहीत असतं! काही दिवसांतच गादी-उशीला टेंगळं येऊन आपल्याला ॲक्युप्रेशरचा मस्त फिल येतो. मुफ्तमें इलाज! किंवा एखादा लोड, ऊशी जर काही कारणाने उस वावी लागली किंवा फाटली तर काय दिसतं...बरोब्बर! वरवर आपला चांगला कापूस आणि आंत मध्ये...?

*माळ्यावरील कापसाच्या पोत्यांचं रहस्य*  आत्तां उलगडतं...पण आतां काय करणार!

अशावेळी आपल्या भ्रमाचा भोपळा फटकन फुटतो. बरं तेवढ्यासाठी ते सगळं ओझं त्याच्याकडे घेऊन त्याच्या पदरांत त्याचं माप घालणं शक्यच नसतं. किंवा नुसतंच जाऊन त्याला जाब विचारणं...? काय उपयोग! त्यापेक्षा घरचा आहेर गपगुमान स्वीकारावा हे उत्तम.

डनलाॅपच्या गाद्या तर आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात असं आपलं ठाम मत असतं. मग...?

मग काय...?

 *भरे जैसी गादी। तैशी नीज घ्यावी*

     *कुस पालटावी । वारंवार*


सौ.भारती महाजन-रायबागकर 

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

      

Wednesday, June 2, 2021

30. आधुनिक बलुतेदार

 *30*     *आधुनिक बलुतेदार*


 नवीन भांडी घेऊन आलो. आणि ती लगेच वापरण्याचा मोह तर होणारच. म्हणून लगबगीनं स्वयंपाक करायला जावं तर... डब्यात कणिक पीठ काहीच नाही. आतां.... काय म्हणता...? नुसता भात किंवा खिचडी करून खायची...! छे...ते! आपल्या नाही बुवा पोट भरत तेवढ्यांन... पोळी भाकरी पाहिजे म्हणजे पाहिजेच... त्यासाठीच तर...


 पहिली माजी ववी ग। 

द्येवा पांडुरंगाला।।

उदंड आऊक्ष लाभू दे।

कपाळीच्या कुक्काला


दुसरी माजी ववी ग।

माझ्या धुरपतीला।।

ल्येक आली म्हायेराला।

पंचिमीच्या सनाला


जात्याच्या घरघरीत आपला सूर मिसळून पुराणांतल्या, इतिहासातल्या, संसारातल्या घटनांची, नात्यांची सांगड घालुन, ओव्या म्हणत दळणाचे श्रम हलके करणाऱ्या ग्रामीण स्त्रिया आतां आतांपर्यंत दिसायच्या. पहाटेच्या पवित्र वातावरणांत त्या सुरांनी पहाट मंगलमय होऊन जायची. पण हे कानांना कितीही गोड लागत असलं आणि व्यायाम- बियाम होऊन शरीर काटक, घाटदार होतं हे कितीही खरं असलं तरी आता ऐकायला रेडीओ,  मोबाईलवरचं प्रभात संगीत असतं आणि व्यायामाचं म्हणाल तर त्यांना इतर कामं काय थोडी असतात होय? आणि शहरांत जर गिरण्या किंवा रेडिमेड आटा वापरला जातो तर ग्रामीण स्त्रियांनी तरी जात्यावर दळण्याचे कष्ट कां करायचे?(आणि व्यायामासाठी जिम असतंच कीं... शहरांत)


 बरोब्बर! आजचा बलुतेदार आहे...


*पिठाची गिरणीवाला*


पीठ, कणिक ही तर आपली अत्यावश्यक दैनंदिन गरज. ते घरचं असो, गिरणीचं असो किंवा रेडिमेड. आपला एक दिवसही त्यावाचुन निभणार नाही. मग पिठाच्या गिरण्या सुरू होणं तर अपरिहार्य! एक छोटासा गाळा असला की पुरे! मग तेथे पांढरट दगडाचं मोठं जातं, ते चालवण्यासाठी मोटार, त्याला आणि धान्य टाकायच्या यंत्राला जोडणारा एक रुंद पट्टा, धान्य टाकण्यासाठी एक गोल, मोठ्या तोंडाचं पत्र्याचं नळकांड्या सारखं भांडं आणि खालच्या बाजूला दळलेलं पीठ पडण्यासाठी एक रुंदसं तोंड.


पूर्वी ही गिरणी डिझेलवर चालायची. तिचा फक् फक् असा वेगळाच आवाज यायचा. एखादी बाई बापडी दळण घेऊन यायची आणि म्हणायची, 


 "दादा, अर्जंट पायजेल बग, पीट न्हाई घरात आन् पाव्हनं यिवुनश्यान बसल्यात". 


त्यावर तो नाईलाजानं म्हणायचा, 


"ते समदं खरं आहे,पण डिजल संपलंय, काय करू मग!"त्यावर


"अरे द्येवा! आता उसनवारी कराया पायजेल"


असं म्हणून ती हताशपणे निघून जाई. 


हळूहळू अपवाद सोडले तर खेड्यापाड्यातही वीज आली. आणि गिरण्या विजेवर चालू लागल्या. आता डिझेल सारखी तीही संपतेच कधीकधी. संपते म्हणजे येणं-जाणं हा लपंडाव चालूच असतो ना! लोडशेडिंगच्या काळांत तर वीज असण्याच्या वेळी त्या गिरणीवाल्या वरच अधिक लोड असतो. कारण सगळ्यांनाच लवकर पीठ हवं असतं. 


बरं त्यांतही गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा दाळ असे विविध प्रकार आणि ते एकाच घरचे असले तर मग आणखीच पंचाईत. कारण पुढच्या नंबरच्या गिर्‍हाईकाला गव्हांवर गहूच दळुन हवे असतात. मग पहिल्या नंबरचे ज्वारी, डाळ इत्यादी इत्यादी साईड ट्रॅकवर पडतात. असे पुढचे नंबर जितके जास्त तितके हात चोळत, चरफडत बसण्याचा वेळ जास्त.

कारण आपल्याला आपल्यासमोरच दळण दळून हवं असतं नं! नाहीतर पीठ जाड, बारीक तरी व्हायचं किंवा पीठ खाल्ल्याचा (शब्दशः) तरी संशय असतो. अखेर 

"तुझ्या सवडीनं ठेव दादा दळून, नंतर येऊन नेता येईल, कामं पडलीत माझी" असं म्हणत आपण रागारागांत निघून जातो. आणि गिरणीवाला त्या समोरच्या गिर्‍हाईकाला म्हणतो,

"आतां मी चार धान्यांच्या चार गिरण्या लावु कां काय? एकाचं ऐकावं तर एक नाराज होतो. भाव वाढवला तर मात्र सर्वजण कुरकुर करतात. मला पण पोट आहे कीं नाही?"


पिठाचं जाड-बारीक पण हा तर नेहमीच वादाचा मुद्दा असतो.एखादेवेळेस आपल्याशिवाय म्हणजे (आपणच,) दुसरं कोणी गेलं तर... 

"लक्ष कुठे होतं? कुठे गेले होते? त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसले असाल...आतां ह्या जाड पीठाच्या पोळ्या नाही, रोटले करून खाऊ घालते जाडजाड"

असा शाब्दिक आहेर मिळतो.


कधी हरभरा डाळ कितीही गरम करून नेली तरी तो हात लावून म्हणणार,

"सादळली आहे, आतां नाही दळल्या जाणार, पुन्हा गरम करून आणा."

'आता काय शेगडी घेऊन येऊ इथे' 

असं आपण  म्हणतो (अर्थात...मनांतल्या मनांत) अशावेळी आपलं डोकं मात्र नको गरम व्हायला.


आतां कितीतरी कंपन्यांचा रेडीमेड आटा जरी मिळत असला  

आणि *घर के चक्की जैसा आटा* अशी कितीही भलामण करत असले तरी तो नाइलाज म्हणूनच वापरला जातो. कधी गिरणी जवळ नसते, कधी आपल्याला वेळ नसतो, कधी गहू मिळत नाहीत अशी अनेक कारणं असतात.


यावर उपाय म्हणून आता घरघंट्या उपलब्ध झाल्याहेत. अगदी एका स्टुलच्या आकारापासुन ते एखाद्या छोट्याशा टेबलाच्या आकारापर्यंत जागेच्या उपलब्धतेनुसार त्या आपल्याला घेता येतात. पण त्या साफ करण्याची ही कटकट नको म्हणून रेडीमेड आटा घेणारे आहेतच. शिवाय हेही काम बहुतांशी स्त्रियांनाच करावं लागतं.अपवाद सोडा.


सैन्य पोटावर चालते असं म्हणतात. त्यांच्या पोटासाठी टनावारी पीठ दळण्यासाठी काय वापरत असावेत बरं! मला फक्त औरंगाबादची पाणचक्की तेवढी माहित आहे.


तर असा हा गिरणीवाला...दिवसभर ते बारीक पीठाचे कण नाकातोंडावाटे शरीरांत जाऊन त्याला अपाय तर होत नसेल? पीठ उडू नये म्हणून गिरणीच्या तोंडाला एक कपडा बांधलेला असायचा. तसं कांही तो तेव्हां *आपल्या* तोंडाला बांधत नसे. *आतां*?  


जातां जातां एक गंमत... मी लहानपणी रावळगाव चॉकलेट फॅक्टरी गेले होते. तेथे अशा गिरणी सारख्या यंत्रातुन वरून कोरडे मिश्रण टाकल्यावर खालुन मिंटच्या चौकोनी गोळ्या पडतांना पाहिल्या होत्या.


 मनात आलं...वरून पीठ टाकुन खालुन आपोआप तयार पोळ्या मिळणारं *छोटसं घरगुती यंत्र* आलं तर...


सौ. भारती महाजन- रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

Tuesday, June 1, 2021

29 आधुनिक बलुतेदार

 *(29*  *आधुनिक बलुतेदार*


आत्तां कुठे घर स्थिरस्थावर झाल्या सारख वाटतंय. जरा नव्यासारखी झळाळी आलीय. तशी... स्वयंपाक घरात... भांडी खूप आहेत...पण *किचनमध्ये* ही जुनी भांडी ज...रा...


 आलं ना लक्षांत...


*भांडी दुकानदार*


खूप पूर्वी लहान खेड्यांत मातीच्या भांड्यात अन्न शिजवत असत आणि लाकडाच्या परातीत (काठवट) कणीक भिजवत असत. अजूनही काही खेड्यांत नक्कीच अशाप्रकारे अन्न शिजवत असतील. पण खूप ठिकाणी आता स्टीलची

किमान ॲल्युमिनियमची भांडी वापरायची पद्धत सुरू झाली आहे.


फार जुनी गोष्ट नाही. स्टीलच्या भांड्यांनी बाजारात नुकताच चंचुप्रवेश केला होता. पण बऱ्याच ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करायचा असेल तिथे स्वयंपाकासाठी पितळेची भांडी वापरली जायची. प्रदेशानिहाय त्यांना गंज, पातेलं, भगुनं असं म्हणत. वरण शिजवण्यासाठी गोल बुडाचा लोटा, भरत्या असायचा.

 अन्न करपु नये म्हणून रोज रात्री त्यांना ओल्या मातीचा पातळ थर द्यावा लागायचा. चुलीच्या पोतेऱ्याबरोबर हे एक आवश्यक काम असायचंच.


त्यानंतर ॲल्युमिनियम, मग त्याहुन थोडं जाड, न करपणारं... विशेषतः दुधासाठी...आलं. त्यांनी कांही दिवस राज्य केल्यावर त्यांच्या भल्याबुऱ्या परिणामां बद्दल कांहीबाही बोललं जाऊ लागलं आणि नंतर मात्र किंमतीच्या तुलनेत टिकाऊ आणि स्वच्छ करण्यास सोपे, मुख्य म्हणजे कल्हई करण्याच्या  कटकटी पासून सुटका...त्यामुळेच  भांड्यांच्या विश्वांत स्टेनलेस स्टीलनं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं.


पाण्यासाठी मुख्यत्वें तांब्याची भांडी वापरल्या जात. त्यांना कल्हईचे काम नसले तरी तीं चकाचक घासणे हा एक सोहळाच असायचा. तेवढा वेळ आतां कोणाला असतो! त्यामुळे त्यांतही वेगवेगळ्या घाटांचे हंडे, पिंपं,कळश्या विराजमान झाल्या. 


याशिवाय आवश्यक- अनावश्यक अशा अनेक वस्तूंसाठी आपण गरज किंवा हौस म्हणून जेव्हां भांड्यांच्या दुकानांत जातो तेव्हां चारही भिंतीवर, मधल्या जागेत, छतावर अडकवलेली, दुकानाच्या बाहेरील भागांतील उतरंड अशा दहाही दिशांना भरगच्च भरलेल्या...तांबे, पितळ, स्टील, हिंडालियम आपले स्वतःचे रंग घेऊन दिव्यांच्या उजेडांत त्या दुकानांत चमकत असतात. आणि तो दुकानदार आपला      वेगळाच रंग घेऊन गल्ल्यावर बसलेला असतो. पण त्याचं आपल्याकडे मात्र बारीक लक्ष असतं. चेहऱ्यावरून, पोषाखावरून, आधुनिक पोशाखाआड दडलेल्या  बोलण्याच्या ढंगावरून तो गिऱ्हाईकांवर गरजु, टाईमपास, हौशी इ.शिक्के लावुन टाकतो.


 आणि मग एका दांडीला बांधलेल्या मळकट कपड्याने भांड्यांवरची धूळ झटकत असणाऱ्या नोकराला आवाज देऊन सांगतो...

"अरे, ताईंना ते... हे... दाखव बरं! आणि ती कालच आलेली नवीन वरायटी पण दाखव. *(ताईंनाच* इथे साहेबांचं काम असलंच तर मुलं सांभाळायचं किंवा पिशव्या ऊचलायचं असतं.) एखाद्या वेळेस आपल्याला हवं असलेलं भांडं छताला टांगलेलं असलं तर काठीच्या टोकाला असलेल्या हुकानं तो ते इतकं लीलया काढतो कीं बस्...


कधी कधी आपण विंडो शॉपिंग करत असतांना अचानक आपल्याला मैत्रिणीकडे पाहिलेला चमच्यांचा आधुनिक सेट आठवतो. *जुळ्याचं दुखणं* दुसरं काय! आपण सहजच बघू तर खरं असं म्हणत दुकानात शिरतो आणि घरांत डझनावारी चमचे असतांनाही पुन्हां तस्सेच चमचे घेऊन निघणार तेवढ्यात...

"काय ताई... एवढ्या सुंदर चमच्याने तुम्ही जुन्याच प्लेटमध्ये खाणार आणि पाहुण्यांनाही देणार? कसं दिसेल ते!     ह्या डिश बघा,एकदम मॅचिंग आहेत चमच्यांना..." आपल्यालाही ते पटतं आणि मग त्याच्या जोडीला वाट्या ही कधी येऊन बसतात ते बिल देतांनाच कळतं.

तेव्हांही तो हळूच म्हणतो...

"एक मस्त डिनर सेट आलाय... आणि नवीन पद्धतीचा कुकरही... दाखवू कां? एकदम रिझनेबल रेट मध्ये...लिमिटेड आहे स्टाॅक..."

आपल्यालाही मोह होतो, पण तिरप्या नजरेने  हळूंच *तिकडं* बघितलं तर आपल्याला निग्रहानं नकार द्यावा लागतो. आपण तिकडे बघितलेलं त्याच्याही लक्षात येतं... तो म्हणतो...

"ठीक आहे, पुढच्या वेळी...तेव्हां मात्र तुमच्या त्या मैत्रिणीला घेऊन या... मागच्या वेळी आणलं होतं त्यांना..."


 कपड्यांच्या दुकानां सारखेच आतां भांड्यांचे पण इतके प्रकार आले आहेत कीं... *हे घेऊ कीं ते घेऊ, दुकान उचलुनी कां नेऊ!*  म्हणत आपण आपल्या घराचं खरोखरच *मिनी भांडी भांडार* करून टाकतो. तरीही वेळेवर हवं ते भांडं सापडेलंच याची खात्री नसते ते वेगळंच.


भेटुया...

सौ.भारती महाजन-रायबागकर

arati.raibagkar@gmail.com

9763204334