Friday, June 4, 2021

32. आधुनिक बलुतेदार

 *32*   *आधुनिक बलुतेदार*


काल जेवण झाल्यानंतर उशीर झाला म्हणून तसंच झोपुन गेलो. टोचणाऱ्या गादीवर झोप आली नाही ही गोष्ट वेगळी. 


आतां मात्र हा पसारा आवरतांना आपली कंबर ढिली होणार. कारण कामवाली मावशी दुपारी उशीरा येणार, नंतर   धुसपुसत तो पसारा कसाबसा आवरणार, तोपर्यंत हे काम असंच कसं ठेवायचं. त्यांतही ती आली तर ठीक, नाहीतर अचानक सुट्टी घेतली तर... 


 अशी ही जिच्यावाचुन आपले, विशेषतः महिलांचे पदोपदी अडते  ती... आपली…


      *मोलकरीण, कामवाली बाई किंवा मदतनीस*



पूर्वी गांवातल्या सर्वच बायका घरचं काम स्वतः करत. शिवाय शेतांत मजुरीलाही जात. त्यामुळेच मालकीण आणि कामवाली बाई त्या स्वतं:च असत. फक्त तालेवार  किंवा सावकार यांच्या घरी माणसं /बायका  कामाला असत. वडिलोपार्जित मिळालेलं कर्ज, आणि त्यावरील व्याज फिटण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी काम करण्याशिवाय गत्यंतरच नसे. कर्ज फिटत नसेच, ही गोष्ट वेगळी. मग त्यांची मुलं ते कर्ज फेडण्यासाठी तिथंच कामाला जाऊ लागत. असं पिढी दर पिढी हे दुष्टचक्र चालत असे.


पुढे शहरांत स्त्रिया नोकरी करू लागल्या आणि त्यांना मदतीला कोणीतरी हवं असं  वाटु लागलं. नोकरी केली नाही तरी घर काम करणे हे तब्येतीमुळे किंवा कंटाळ्या मुळे शक्य होत नसे. गांवातून शहरांत आलेल्या गरीब कुटुंबांनाही कांहीतरी काम हवंच होतं. असं दोघींच्याही गरजेतून घरकाम करणाऱ्या मावशींची  जमात उदयाला आली असावी. 

 ( दोन-तीन दिवस जर बदली न देता बाई आली नाही तर किती तारांबळ उडते आपली. अक्षरशः देव आठवतात सगळे. गृहिणी असली तर कसंतरी निभावून तरी नेता येतं. पण नोकरदार स्त्रियांची तर तारेवरची कसरत असते. )


तिला कामावर ठेवतांना साधारण असे प्रसंग घडतात. आपण तिला आधी आपल्या कामाचं स्वरूप समजावून सांगत असतो तेव्हां ती आपल्या पूर्ण घरावरून शोधक नजर फिरवत असते, घरातल्या माणसांचा अंदाज घेते, आणि मग विचारते, "काय काय काम करायचं हाय?"

 (समजा)

आपल्याला स्वयंपाकाला बाई ठेवायची असली तर आपण म्हणतो,

“ आम्ही पांच माणसं आहोत, त्यांचा स्वयंपाक करायचा. फुलके पातळ झाले पाहिजेत, चट्टे पडायला नको. फुलके सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेला गरम करायचे. भाजी नीट बारीक चिरुन घ्यायची. जास्त तिखट करायची नाही. आणि सर्वांत शेवटी कुकर लावायचा. ओटा नी...ट आवरून घ्यायचा. त्यानंतर इतर कामं करायची. आपल्याला मध्येच थांबवून विचारते, 

“थांबा थांबा, ताई,

 पोळ्या किती करायच्या? त्याप्रमाणे माज्या येन्याआदी तुमी कणीक मळुन ठेवायची. प्रत्येक पोळीचा इतका रेट हाये. ज्यादाच्या पोळीचे ज्यादा पैसे लागतील. आन भाजी तुमी चिरून ठेवायची. पालेभाजी असली तर आदी धुऊन घ्यायची. डाळ तांदूळ धुऊन ठेवायचे.”


“ आणि मग तू काय करणार?”


मी फक्त पोळ्या लाटणार, भाजी  फोडणीला घालणार, आणि डाळ तांदळाचे डबे कुकरमध्ये ठेवून तो गॅसवर ठेवणार.!


 तिनं सांगितलेल्या रेटप्रमाणे आपण आयुष्यभर किती रुपयांच्या पोळ्या लाटून, प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे, गरम करून खाऊ घातल्या याचा मनांतल्या मनांत हिशोब करून आपण हतबुद्ध होऊन पहातच रहातो. तिला कांही बोलणार एवढ्यात आपले गुडघे हलवून हलवून आपल्याला भानावर आणतात. आंता पोळ्या लाटणं तर होतच नाही. मग काय करणार! तिच्या अटी ऐकणं

भागच पडतं.


“आणखी काय काय कामं करायचीत?” तिनं विचारल्यावर आपण सांगायला सुरुवात करतो...


"हे सर्व घर झाडून घ्यायचं, कोन्या कोपऱ्यातून..."

" बरं पुढं... "

“सर्व फरशी नीट पुसून घ्यायची, प्रत्येक खोलीतील फरशी पुसून झाल्यावर पाणी बदलायचं.”

“आस्सं... पुढं...”

"कपडे हाताने धुवायचे”

"कामुन  वं, ती मशीन दिसतीया कीं..." आपल्याला थांबवुन ती विचारते, 

“मला नाही आवडत मशीनचे कपडे...”

“भांडी स्वच्छ घासायची, साबण ठेवायची नाही, आणि दोनदा यायचं सकाळ-संध्याकाळ...”


"झालं तुमचं?" ती शांतपणे विचारते.


"आता सांग, किती पगार घेशील?”  

आणि तिने सांगितलेला आंकडा ऐकून आपण एकदम जमिनीवर येतो.

“अगं खूप झाला हा, मी पहिल्या बाईला इतकाच देत होते.”


“ म्हणून तर ती सोडून गेली न्हवंं, आसंल एकांदी आडलेली, मी बी तेवडाच पगार घिन, पर एकाच बकेटीत पुऱ्या घरची फरशी पुशीन, कापडं हातानं धुनार नाय, ती वाशिंग मशीन जाम हुईल वापरल्या बिना...आणि भांड्यान्ला आन् पोळ्यान्ला      बी एकडावच यीन, आन जुनं कापडं तुमी माझ्या बिगर कोणाला देनार! हाय का कुबुल?”

आणि आपण शरणागती पत्करून 'कबूल, कबूल, कबूल ' असं म्हटलं कीं ती विचारते, “

“मंग यिऊ का उद्यापास्नं?”

आपण हो म्हटल्याबरोबर ती आठवल्यासारखं करून म्हणते...

“रविवारी मी येणार नाय, माजी सुट्टी असते, आन्  ती भांडी सोमवारी घासायला टाकायची न्हाईत. आल्या आल्या मला च्या लागतो, ताज्या दुधाचा... आदीची उकळलेली पावडर टाकायची नाय, पावन्यांचे कापडं मी धुवायची नाय, आन् अधनंमधनं खाडे झाले तर ते कापायचे नाय. ठरलं तर मग ...येत्ये उद्यापास्नं. किती वाजतां यिऊ? "


 आणि आपण विचार करून सांगते असं म्हणेपर्यंत आपली पाठ, कंबर आपल्याला *हाय, हॅलो*  असं म्हणतात. शिवाय उद्या तिचा विचार बदलला तर काय करायचं या धास्तीने आपण घाईघाईत तिला म्हणतो,

"अगं, उद्यापासुन  कशाला?आजपासुनच...नाही, नाही... आत्तांपासुनच सुरु कर कीं काम!"


भेटुया…...


सौ. भारती महाजन-रायबागकर, चेन्नई

bharati.raibagkar@gmail.com

9763204334



No comments:

Post a Comment