Sunday, June 6, 2021

33 आधुनिक बलुतेदार

 33 *आधुनिक बलुतेदार*



      तर मंडळी!

कामवाल्या मावशीचे अनुभव किती जणींना आपल्या अगदी जवळचे वाटले? सध्यांच्या काळांत बाकीची सर्व कामं आपण थोपवून धरली असली, तरी रोजची झाडू, फरशी, धुणी,भांडी ही कामं मात्र रोजच करावी लागतात. त्यातलं कपडे धुणं एकदा, फरशी पुसणं एकदा किंवा एक दिवसाआड, झाडणं दोनदा अशी केली तरी चालतात. भांडी मात्र एखाद्या गाण्यांतील कडव्यांच्या संख्येनुसार गाव्या लागणाऱ्या 

ध्रूवपदा प्रमाणे दिवसांतून किमान तीनदा तरी घासावी लागतात. आणि मग आपल्या कामवाल्या मावशीची आठवण कितीदातरी येते.आतां जेव्हां ती पुन्हा कामावर येऊ शकेल तेव्हां तिच्याशी कामांबद्दल तक्रार करतांना आपण नक्कीच पुन्हां पुन्हां विचार करू. तिच्या वंशाला जाऊन आपल्याला आतां पुरतं कळून चुकलंय कीं.......


सध्यां जरी ती आपली कामं करू शकत नसली तरी कुणी तिचा पूर्ण पगार देतंय, कुणी अर्धा आणि कुणी कांहीच देत नाही. आपल्याला वाटतंय की तो पगार देऊन आपण उपकार करतो तिच्यावर...पण वस्तुस्थिती तशी नाहीये, तिला खूप शरमिंध वाटतंय हा फुकट पगार घ्यायला. 'सगळी काळजी घेईन, पण मला कामावर येऊ द्या, आंग आंखडुन गेलंय बसून बसून.' असे तिचे सारखे फोन येत आहेत. अशावेळी तिला कामवाली, मदतनीस यापेक्षांही आपल्या घरच्या सदस्याचा दर्जा द्यावासा वाटतो.


पूर्वी गांवात बारा बलुतेदार असत. आपण तब्बल दोन डझन पेक्षाही जास्त बलुतेदारांना भेटलो. त्यांतील कांही जण 'अलुतेदार' होते तर कांही 'बलुतेदार, तर कांही कामवाल्या मावशी सारखी 'महाबलुतेदार.' अलुतेदार म्हणजे नैमित्तिक प्रसंगी लागणारे आणि बलुतेदार म्हणजे वारंवार लागणारे. त्यांच्या कामाच्या महत्त्वाप्रमाणे त्यांना धान्य दिले जात असे. फक्त तेव्हां ते शेतकऱ्यांच्या /मालकाच्या मनांवर असे. आतां मात्र जमाना बदलला, भूमिकाही बदलल्या.


यांतील कांही परंपरागत बलुतेदारांनी काळाबरोबर बदलत आपलं स्वरूप बदललं. नव्या जीवनशैलीला अनुरूप असं कौशल्य आत्मसात केलं आणि ते फक्त तगुनच राहिले असं नाही तर शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी आपली प्रगतीही केली. काहींनी लोकांच्या वाढत्या गरजांच्या संख्येनुसार/प्रकारानुसार नवनवीन कामं शिकून घेतली आणि ते *आधुनिक  बलुतेदार*  म्हणून उदयाला आले. ज्यांना कांहीच जमलं नाही ते मात्र नाईलाजानं जीवनौघांत प्रवाहपतिता सारखे वाहत राहिले.


तांत्रिक युगांत कुटुंबाचा आकार आक्रसत असतांना आणि आपलं वर्तुळ *आपण-आपलं* *आम्ही-आमचं* *ते *मी-माझं* असं संकुचित होत असतांना ही सर्व मंडळी मात्र आपल्या आयुष्याच्या परिघांत सहज सामावल्या जातात. ते नातलग नसतात पण त्यांचं असणं ही आपली गरज असते. 


आपली बरीचशी नाती रक्ताची असतात. ती जन्माबरोबरच आपल्या सोबत असतात. पण कधी कधी ती फक्त *आहेत* म्हणून *असतात*. त्यांत मायेचा ओलावा, जिव्हाळा असतोच असं नाही. तर पुष्कळदा रक्ताचं कांहीच नातं नसतांना फक्त प्रेम, स्नेहाच्या रेशीम धाग्यांच्या नात्यांची वीण अधिक घट्ट, गहिरी होत जाते. इतकी घट्ट की संशयाच्या, गैरसमजाच्या दुःखाचं सावट जरी त्यावर पसरलं तरी ते लगेच विरून जातं. या नात्यांना नावाचं लेबल नसतं, ती अनाम असतात इतकंच...

 जवळपास गेल्या महिनाभर आपण दररोज एका बलुतेदाराला भेटत होतो.


मंडळी! या प्रत्येक बलुतेदाराच्या केलेल्या वर्णनातील  प्रसंग कमी जास्त प्रमाणांत आपल्या प्रत्येकाच्या अनुभवास आले असावेत. पुढेही आपल्या दैनंदिन व्यवहारांत, भविष्यातही कदाचित त्यांचे अनुभव येतच राहतील. लिहिण्याच्या ओघांत कुठेकुठे अतिरंजितपणा आलाही असेल, पण तो क्षम्य असावा.


हे लिखाणही मी *थोडक्यात गोडी* या उक्तीप्रमाणे केव्हांच संपवणार होते. रोज लेख पाठवला कीं ठरवायचे, हा शेवटचाच बरं कां!  पण रात्री प्रतिक्रियांच्या शेवटी *आतां उद्या कोण?* हा प्रश्न वाचला कीं तो निश्चय डळमळीत होऊन मी पुन्हां पुढच्या बलुतेदाराला आपल्यापुढे सादर करायचे. 


कांही बलुतेदार अजूनही एकमेकांना बाजूला सारत 'मला पण भेटू दे नं सर्वांना... मला पण 'असं म्हणत माझ्याकडे हट्ट करत आहेत, पण....


*कधी थांबणार?* या प्रश्नांपेक्षा *कां थांबलात?* हा प्रश्न जास्त अर्थपूर्ण आहे, असं थोरामोठ्यांनी म्हणून ठेवलंय, नुसतंच म्हटलं नाहीतर आचरणातही आणलंय. माझी त्यांच्याशी  तुलना करण्याचा अजिबात विचार नाही, ती होऊच शकत नाही. पण *महाजनो येन गत: स पन्थ:* मी विराम घेतलाय.

या लेखन प्रवासांत आपण सर्वांनी आपल्या बहुमोल भावना वारंवार माझ्यापर्यंत पोचवल्या.

मी आपली अत्यंत आभारी आहे.

भेटुया........ पुन्हां....... कधीतरी


सौ..भारती महाजन-रायबागकर

bharati.raibagkar@gmail.com

9763204334

No comments:

Post a Comment