Tuesday, July 6, 2021

काजव्यांची पालखी, स्वप्नांची पहाट

 *नक्षत्रांची पालखी निघाली*

*पहाट स्वप्नांची फुलली*


मध्यरात्रीची वेळ...संध्याकाळपासूनच विजांचा कडकडाट चालु आहे...दूरवर कुठेतरी थोडासा पाऊस पडतोय वाटतं...वीजही गेलेली...त्यामुळे सर्वत्र अंधाराचंच साम्राज्य...अन् निद्रा जागृतीच्या सीमेवर मनाचा लंबक हिंदकळतोय...भास-आभासांचा लपंडाव...स्वप्न-सत्याची शिवाशिवी...एक अनामिक हुरहुर...


पण हे काय... हा कुठला प्रकाश...मिटलेल्या डोळ्यांसमोरूनही त्याचा मंद उजेड जाणवतोय...अं हं...हा कांही लखलखणाऱ्या विजेचा प्रकाश नाही...डोळे दिपवुन टाकणारा...एक शांत...स्निग्ध अशी भावना जाणवतेय डोळ्यांना...वीजही आलेली नाही...मग काय असावं बरं... *उघड नयन देवा* ... अरे, हे...हे काय...


नभ उतरू आलं

धरा चांदणं ल्याली...


छे...छे...आकाशांतील चांदण्या तर तश्शाच आहेत...आपापल्या जागी...मग...


ओ हो...! हे तर काजवे...असंख्य...अगणित काजवे... ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत...काजवेच काजवे...काजव्यांची पलटण...? कांहीतरीच काय...ते काय सैन्य आहे लढाईला निघालेलं...मग...? काजव्यांचा मोर्चा...?बाई, बाई...काय ही कल्पनेची धाव...सरड्यासारखी कुंपणापर्यंत...काजव्यांची मिरवणुक...?बस् झाली निरर्थक उपमांची घोडदौड... 


ही तर काजव्यांची पालखी आहे पालखी...! हं...आतां हे नांव कसं छान शोभुन दिसतंय...


वारीत निघणाऱ्या पालख्या...पंढरपुरला निघालेल्या...विठ्ठलाच्या दर्शनाला... हरीनामाचा गजर करीत... समतेचा संदेश देत...मी...तू पणाचा विसर पडलेला... सर्वत्र भक्तीचाच रंग...भगवा...आणि तो रंग मिरवणारे वारकरी...शुभ्रधवल रंगात... *अवघा रंग एक झाला...*


हे काजवेही कांहीतरी संदेशच देत आहेत वाटतं...मी इवलासा असलो म्हणुन काय झालं...मी सूर्य नाही होऊ शकत... सगळ्या जगाला प्रकाश देणारा...पण मी माझ्यापुरता टिमटिमता  प्रकाश तर देऊ शकतो...आणि आमचा हा प्रकाशपुंज... यातुन बघा कसा प्रकाश निर्माण होतोय...थोडा उजेड कमी असेल पण तुम्हाला मोहुन तर टाकतोय...आमच्या एकीचं बळ आहे हे...


आणि ह्या पालखीचे भोई तरी कोण कोण आहेत...जराशी ओळख पटतेय...अरे, ही तर *आपली* *साहित्यनक्षत्रंच* आहेत सगळी...काजव्यांच्या मंद मंद प्रकाशांत सगळी कशी उठून दिसताहेत...स्वयंप्रकाशाने...


आपणही व्हावं कां त्यांत सामील...पेलवेल नं आपल्याला भोई  होणं...? हो...हे भोई कांही असे तसे नाहीत...सारस्वत आहेत ते सगळे...पण...घेतील ना ते आपल्याला त्यांच्यात... कां नाही...नक्कीच घेतील...अशी शंका सुद्धां कां यावी मनांमध्ये... आत्तांच काजव्याचा संदेश ऐकला ना... मग...?  तरीही...


*मैं अकेला था और कारवॉं बनता गया...*

असंच तर होत असतं नं...


 हो...त्या कारवॉंमध्ये सामील व्हायलाच हवं...आपल्या चालीनं...हळूहळू...पण सामील व्हायचंच...


पण मग... त्यासाठी आतां या निद्रादेवीची साथ सोडायला हवी...हो...हो...बरोबर...स्वप्नं पहाण्यासाठी तिचीच साथ हवी... पण तीं पूर्ण करण्यासाठी मात्र...उषेचेच स्वागत करायला हवे...तर आणि तरच... *स्वप्नांची पहाट फुलेल...* आणि ईप्सित साध्य करता येईल...खरं नं...?


सौ.भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

No comments:

Post a Comment